Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’

महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’

Friday September 29, 2017 , 3 min Read

महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईडच्या पुरस्काराने रामा खांडवाला यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट एकल रेस्टॉरन्ट पुरस्कार मुंबईतील खैबर या रेस्टॉरन्टला मिळालेला आहे.


छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार


पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष २०१५-१६ चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री के.जे. अल्फोंस, पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, महासंचालक सत्यजीत राजन, आर्थिक सल्लागार लीना सरन मंचावर उपस्थित होत्या. यासह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायाशी निगडीत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळा’ला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तनेजा आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी यांनी स्वीकारला.

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण अशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ असून एकूण देशभरातील विमानतळाच्या १७.२% टक्के वर्दळ एकट्या या विमानतळावर असते. रोज किमान २५ ते ४० लाख प्रवासी या विमान प्रवास करण्यासाठी चढउतार करतात. २०१५ मध्ये या विमानतळाला गुणवत्ता नियंत्रणासाठी आंतराराष्ट्रीय विमानतळ परिषदेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. हे विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिम प्रदेशातील २९ शहरांना जोडते. या विमानतळावरून दररोज जवळपास १९० विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील ९० ठिकाणांसाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.

मुंबईच्या रमा खांडवाला यांना सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईड राष्ट्रीय पुरस्कार

image


मुंबईच्या रमा खांडवाला यांना ५० वर्ष पर्यटक मार्गदर्शक म्हणून निभावलेल्या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट ‘पर्यटक मागदर्शक’ या राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

श्रीमती रमा खांडवाला या वरिष्ठ पर्यटक गाईड आहेत. मागील ५ दशकांपासून त्या पर्यटन क्षेत्रात काम करीत आहेत. सध्या त्या ९१ वर्षाच्या असून आजही पर्यटक गाईड म्हणून सक्रीयपणे अनेकांना मागदर्शन करतात. भारतीय स्वातंत्र्य लढयात त्यांनी सक्रीय सहभाग निभावला असून त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या राणी झांसी महिला सैन्य तुकडीत सेकंड लेफ्टनंट म्हणून काम सांभळले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सेवा करावी या उद्देशाने त्यांनी पर्यटन मार्गदर्शक म्हणून १९६८ पासून सुरूवात केली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांच्या पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करून महाराष्ट्र दर्शन घडविले. त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली . जपानी पर्यटकांसाठी त्या भारतीय दूवा म्हणून काम करीत होत्या. त्यांनी अनेक देशांच्या मान्यवरांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे पर्यटन घडविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या, जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला लोक बोलवूनच घेतील. माझ्या कामामुळे आज मला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपला देश मनाने खूप श्रीमंत आहे. अनेक पर्यटकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती की, आम्हाला भारतातच राहायचे आहे. आज पर्यटक मार्गदर्शकांना अनेक संधी आहेत त्यांनी त्याचे सोने करावे असे श्रीमती खांडवाला म्हणाल्या.

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्टचा एकल राष्ट्रीय पुरस्कार

image


मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्ट या एकल राष्ट्रीय पुरस्काराने पर्यटन राज्यमंत्री के.जे अल्फोंस यांनी सन्मानित केले. खैबर रेस्टॉरन्ट १९५६ पासून सुरू असून आग लागल्यामुळे जुने बांधकाम पाडून १९८८ ला नवीन बांधकाम केले आहे. या रेस्टॉरन्ट चे डिझाइन हे परवेश्वर गोदरेज यांनी केले असून या रेस्टॉरेन्टच्या आतील भिंतीवरील चित्रे ही जगप्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन आणि एंजोली एला मेनन यांनी काढली आहेत. खैबर रेस्टॉरन्ट मध्ये १७५ लोकांच्या बसण्याची सुविधा आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातनाम व्यक्तींनी इथल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.